लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावे म्हणून पदरचे पैसे घालवायची वेळ आली’
महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून महिलांसाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार
रुपये देण्याची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होते आहे.
पण खरंच तळागाळापर्यंत ही योजना पोहोचली आहे का आणि त्याचे राजकीय परिणाम निवडणुकीत दिसतील का?
हे पाहण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात या योजनेचा आढावा घेत महिलांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधील भादली गावातल्या भिल्लांच्या वस्तीवर आम्ही पोहोचलो, तेव्हा दुपार टळून गेली होती.
या वस्तीवरचे बहुतांश लोक ऊस तोडणी कामगार आहेत.
या वस्तीवर विजेच्या तारा पोहोचल्या आहेत, पण वीज नाही.
घराबाहेर जल जीवन मिशन अंतर्गत आलेले पाण्याचे नळ आहेत, पण पाणी नाही.
घराच्या वऱ्हांड्यात बसून महिलांच्या गप्पा रंगल्या होत्या.
आमच्या सोबतच्या अंगणवाडी सेविकांनी इतरही महिलांना हाक दिली.
पक्कं बांधकाम असलेल्या एका छोटेखानी घराबाहेर महिला जमा झाल्या.
अंगणवाडी ताईंनी विचारलं,
लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचले का? अपवाद वगळता बहुतांश महिलांचं उत्तर होतं – ‘नाही’.
प्रत्येकीचं कारण जवळपास एकच होतं, ते म्हणजे, कागदपत्र नाहीत.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
याच वस्तीवर मुक्ताबाई गायकवाड राहतात.
वस्तीवरच्या इतरांसारखंच त्याही ऊस तोडणी कामगार म्हणून काम करतात.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून त्यांच्यापर्यंत त्यांचा रुपया तर पोहोचला नाहीच.
शिवाय, ते मिळवायचे म्हणून पदरचे पैसे घालवायची वेळ आल्याचं त्या सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या,
“ते म्हणत्यात कागदपत्र घेऊन या तेव्हा पैसे भेटतील तुम्हाला. आमच्याकडं रेशन कार्ड नाहीय.
ते काढावं लागेल सांगतात. ते काढीलं नाही.
“कागदपत्रच नाही काय मग कसं काढायचं मग, कशाचेच नाही, पैशे मगातात रपारप मग.
काही काढायचं मग पैशे मागतात. रेशन नाहीये. या लाडक्या बहिणीचे नाहीयेत.”
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मराठवाड्यातल्याच परतूर मधल्या पडक्या घरात राहणाऱ्या राधाबाई खांडेभराड निराधार आहेत.
पोटची तिन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाहीत.
राधाबाईंना पॅरलिसिसचा अटॅक येऊन गेलाय.
तात्पुरत्या छताखाली ठेवलेला गॅस आणि मांडलेली भांडी हे त्यांचं स्वयंपाकघर.
या स्वयंपाकघरातल्या प्लॅस्टीकच्या बरण्यांमध्ये धान्य आणि भाजी दिसते ती अपवादानेच.
शिळंपाकं खाऊन त्या जगतायेत. तेही मिळेल तेव्हा. याच परिस्थितीमुळे त्यांनी निराधार पेन्शन योजनेसाठी अर्ज केला होता.
2021 पासून त्या पेन्शन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अजूनही हा अर्ज मंजूर झाला नाही.
लाडकी बहीण योजनेचा निधी मात्र त्यांना मिळाला आहे.
त्यातून औषधं आणि दोन साड्यांची खरेदी केल्याचं त्या सांगतात.
पण हे पैसे कुठे आणि कसे पुरणार असा सवालही विचारतात.
त्या म्हणाल्या, “मिळले ना ताई पैसे.. हौ.. पण त्ये कुठले पुरायलेत…
मला तीन हजारच्या औरंगाबादच्या गोळ्या आणायला लागत्यात..
इथल्या शूगर बीपीच्या गोळ्या. कशाचे पुरले आलेत एवढे?”
निधी मिळत नसल्याची तक्रार तर आहेच. शिवाय जेव्हापासून योजना जाहीर झाली
आहे तेव्हापासूनच महागाई वाढल्याचीही तक्रार अनेक महिलांची आहे.
यात वाढलेल्या किंमतींचा भाग आहेच, शिवाय पैसे मिळत असल्याने गावातही
आपल्याकडून दुकानदार जास्त पैसे मागत असल्याचा दावा महिला करतात.
जालन्यातल्या शेतमजुरी करणाऱ्या, वीटभट्टी कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांशी
आम्ही बोललो, तेव्हा बहुतांश महिलांची ही तक्रार होती.
त्यातच रेशन दुकानांमधून महिन्याकाठी मिळणारं गहू तांदूळ असं धान्यसुद्धा
कमी होणार असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे.
- यातल्याच फरीदा शेख शिवणकाम करुन पैसे कमावतात. त्या म्हणाल्या,
- “पैसे आले की महागाई झाली. जसे पैसे मिळाले अकाऊंटला तशी दुसऱ्या दिवशी मी दुकानात गेले,
- तेव्हा दुकानदार म्हणाला लाडकी बहीणीचे पैसे भावानं पाठवले मग हिकडं द्या ना आम्हाला.